स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या लोकप्रिय ‘एमकॅश’ सेवेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेने जाहीर केले आहे की ३० नोव्हेंबर २०२५ नंतर ही सेवा पूर्णपणे बंद होणार आहे. ऑनलाइन एसबीआय आणि लाइट अॅपद्वारे मोबाइल नंबर किंवा ईमेलवर आधारित त्वरित व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना यानंतर नवे पर्याय वापरावे लागणार आहेत. बँकेने आपल्या संकेतस्थळावर नोटीस जारी करून सुरक्षित डिजिटल पद्धतींचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
एमकॅशमध्ये काय सुविधा होती?
एमकॅश ही एसबीआयची अशी सुविधा होती, ज्यात लाभार्थीची माहिती सेव्ह करण्याची गरज नव्हती. फक्त मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून पैसे पाठवता येत. प्राप्तकर्त्याला एसएमएस किंवा ईमेलद्वारे सुरक्षित लिंक मिळत असे आणि त्यासोबत ८ अंकी पासकोड दिला जात असे. या माध्यमातून तो कोणत्याही बँक खात्यात रक्कम ट्रान्स्फर करू शकत होता. लाइट किंवा एमकॅश अॅप वापरून एमपीआयएन सेट करून लॉगिनही करता येत होते. लहान व्यवहारांसाठी ही सेवा लोकप्रिय होती.
सेवा बंद का केली जात आहे?
एमकॅश ही जुनी तंत्रज्ञानाधारित सेवा असल्याने ती आता कालबाह्य झाली आहे. यूपीआयसारख्या वेगवान आणि आधुनिक प्रणालींच्या वाढीमुळे एमकॅशचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला. आज बहुतांश लोक सेकंदात व्यवहार करतात. त्यामुळे एसबीआय डिजिटल परिवर्तनाच्या योजनेंतर्गत अधिक सुरक्षित आणि वेगवान पर्यायांकडे लक्ष केंद्रित करत आहे.
आता कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
एमकॅश बंद झाल्यानंतर मुख्य पर्याय म्हणजे यूपीआय. एसबीआयचे ‘भीम एसबीआय पे’ अॅप सर्व बँक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. शॉपिंग, बिल पेमेंट, रिचार्ज, टॅक्सी बुकिंग इत्यादींसाठीही हे सहज वापरता येते. तसेच आयएमपीएस (२४ तास त्वरित ट्रान्स्फर), एनईएफटी आणि आरटीजीएस हे सुरक्षित आणि सोपे पर्याय कायम उपलब्ध आहेत.
ग्राहकांनी काय करावे?
१ डिसेंबरपासून एमकॅश बंद झाल्यानंतर ग्राहकांनी त्वरित नवीन डिजिटल पद्धतींचा सराव सुरू करणे आवश्यक आहे. बँकेचे अधिकृत अॅप किंवा वेबसाइट वापरून व्यवहार केल्यास प्रक्रिया अधिक सुरक्षित राहील आणि वेळही वाचेल. थर्ड पार्टीला पैसे पाठवण्यासाठी यूपीआय हा सर्वात सोयीस्कर आणि सुरक्षित पर्याय राहील. यामुळे डिजिटल बँकिंग अधिक सक्षम होईल, असे एसबीआयने स्पष्ट केले आहे.









