राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याची तारीख जाहीर

पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी वितरित होणार. राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची मदत; ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य.

Manoj Sharma
PM Kisan Yojana
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याची तारीख जाहीर

Pm Kisan Yojana: केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या हप्त्याचे वितरण 19 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून राज्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांची मदत मिळणार आहे.

- Advertisement -

राज्यातील शेतकऱ्यांना किती लाभ?

सध्याच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण 97 लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी 90 लाख 41 हजार शेतकरी या हप्त्यासाठी पात्र आहेत. फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर शेतीची जमीन नोंदलेली आहे, ते या योजनेसाठी पात्र मानले जातात. सोलापूर जिल्ह्यातील 4,90,566 शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारची नमो शेतकरी योजना

केंद्राच्या धर्तीवरच राज्य शासन ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ ही स्वतंत्र योजना राबवते. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत दिली जाते. प्रत्येकी 2,000 रुपयांचे हप्ते दर चार महिन्यांनी खात्यात जमा होतात. केंद्राचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारचा हप्ता देखील महिनाअखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एक कुटुंब – एकाच सदस्याला लाभ

केंद्र आणि राज्य अशा दोन्ही योजनांमधून एका कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच वर्षाकाठी एकूण 12,000 रुपयांची मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे पती-पत्नीच्या संयुक्त सातबारा उताऱ्यावर जमीन असली तरी लाभ फक्त महिलेलाच दिला जाणार आहे. या नव्या नियमांमुळे सोलापूर जिल्ह्यातील 9,400 शेतकरी अपात्र ठरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

भरपाईची रक्कम चुकीच्या खात्यात!

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानभरपाईसाठी अर्ज केलेल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम चुकीच्या बँक खात्यात जमा झाल्याची प्रकरणे आढळली आहेत. ज्यांना भरपाई मिळालेली नाही त्यांनी आपल्या गावातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (CSC) येथे जाऊन चौकशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंजूर रक्कम कुठे जमा झाली आणि ती वितरित झाली की नाही याची संपूर्ण माहिती तेथे मिळू शकते.

ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रशासनाने 20 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

My Name is Manoj Sharma, I Work as a Content Writer for marathigold.com and I like Writing Articles.